दिल्लीतील निजामुद्दीन येथे तब्लीकी समाजाच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले जव्हार मधील ८ जण जव्हारला परतले त्यांना शहराच्या मध्यवस्तीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ८ जणांमध्ये १ व १६ वर्षांच्या मुलांचा देखील समावेश आहे. वादग्रस्त ठरलेल्या कार्यक्रमातून हे ८ जण भिवंडी मार्गे जव्हारला परतले आहेत. कोरोना विषयी लोकांमध्ये भय पसरले असल्यामुळे लोकांचा मध्य वस्तीतील वसतीगृह क्वारन्टाईन करण्यासाठी वापरण्यास आक्षेप आहे. या सर्वांच्या घशाचे नमुने मुंबईतील जे. जे. रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जव्हार कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामदास मराड यांनी दिली आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक ड. प्रसन्ना भोईर यांनी सर्व कारन्टाईन व्यक्तींना जव्हार शहराबाहेरील भारती विद्यापीठाची इमारत अथवा नगरपरिषदेच्या सनसेट रिसार्ट मध्ये हलविण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजित नायर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्या कडे केली आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे जव्हारकरांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीच्या मरकज मधून ८ जण जव्हार मध्ये परतले; सर्वांना केले क्वारन्टाईन!